आजिवली देवराईची सफर संपवून आमची बस बेडसे लेण्यांकडे निघाली. काहीजण डुलक्या घेत होते तर काही जण चालत्या बसमधूनही दोन्ही बाजूने उभ्या ठाकलेल्या तुंग आणि तिकोना यांचे रूप कॅमेऱ्यात बंदिस्त करत होते. पवना नगरचा विस्तीर्ण जलाशय आणि त्याच्या बॅकड्रॉपला तुंग असा सुरेख फोटो आम्हाला टिपता आला. वाटेत एका चिंचोळ्या रस्त्यावर आमची बस अडली. बरोबर समोर एक टेम्पो येऊन उभा ठाकला होता. समोर आमची अवाढव्य बस बघूनही तो गाडी मागे न घेता शांतपणे थांबला होता. अरुंद रस्त्यामुळे दुतर्फा वाहतूक शक्यच नव्हती. आमच्या ड्रायव्हर चाचांनी जवळ जवळ पाचशे (५००) मीटर बस मागे नेली तेव्हा कुठे तो टेम्पो जागचा हलला आणि बाजूने गेला. बस सारखं अवजड वाहन चालवणं तसं जिकिरीचं काम. अरुंद, खाचखळग्यांनी भरलेले रस्ते, जुनी बस तसेच इतक्या लोकांची जबाबदारी चाचांवर. पण खरंच प्रत्येक ट्रिप यशस्वी होण्यामागे जेवढा हात टीम लीडर आणि इतर सदस्यांचा असतो तितकाच सुरक्षितरित्या आणि जबाबदारीने बस चालवणाऱ्या ड्रायव्हर काकांचा असतो.
साधारण पाऊण तासाने आमची बस बेडसे लेण्यांच्या पायथ्याशी पोचली. बेडसे गावामुळे या लेण्यांना ‘बेडसे लेणी’ असे नाव पडले आहे. पुण्याहून लोणावळ्याला जाताना कामशेत गावाच्या थोडं अलीकडे बेडसे गाव आहे आणि गावाच्या पाठीमागे असणाऱ्या डोंगरावर ही लेणी आहेत. पवना नदीच्या खोऱ्यात भातराशी डोंगराच्या अगदी शेजारी,’सुमती’ नावाच्या डोंगरावर हे सौंदर्यशिल्प आहे. कार्ले भाजे लेण्यांपेक्षा काहीशी दुर्लक्षित त्यामुळे इथे वर्दळही कमी असते. पायथ्याशी गाडी लावायला सहज जागा मिळून जाते. लेण्यांच्या पायथ्याशी कृष्णाई नावाचे हॉटेल आहे, तिथे चहा नाश्त्याची सोय होऊ शकते.
खालून डोंगराकडे दृष्टिक्षेप टाकला कि लेण्यांच्या खाचा /गुहा दिसून येतात. वर चढायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला वाटलं की साधारण दोनशे, अडीचशे पायऱ्या असतील पण प्रत्यक्षात ४००(चारशे)पायऱ्या होत्या.
पण पायऱ्या चढायला अतिशय सोप्या आहेत. आमच्या गटातली सर्व जेष्ठ व कनिष्ठ मंडळी वर पटापट चढून आली.बाकी मंडळी वर चढायच्या आत आमच्या फिरस्तीच्या ग्रुप मधील ‘फास्टरफेणे’ अर्थात डॉक्टर दीपक फेणे यांचा मंदार पेशवेनी एक अप्रतिम फोटोही टिपला.
बेडसे लेणी चढण्यासाठी पुरातत्वखात्याने इथे नवीन पायऱ्या बांधल्या आहेत तसेच पावसाचे पाणी वाहून जावे, साठून राहू नये या साठी काही उंबरे पण केले आहेत. तरी मधून मधून काही जुन्या पायऱ्याही दिसून येतात.
चढताना दोन्ही बाजूला विस्तृत कठडे असल्यामुळे वाटेत दमल्यावर तिथे बसायचा विचार मनात आला तर झटकून टाकावा कारण बरेचदा त्या कठड्यांच्या जवळ साप ऊन खात बसलेले असतात. आम्ही पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती त्यामुळे सापांचे दर्शन काही झाले नाही पण वरती लेण्यांजवळ कात मात्र सापडली.
बौद्ध भिक्षु धर्मप्रसारासाठी जेव्हा निरनिराळ्या ठिकाणी जायचे तेव्हा पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करायला लागायचा. ह्या लोकांची कायमस्वरूपी काही व्यवस्था करण्यात यावी यासाठी लेण्यांच्या निर्मिती करण्यात आली. भारतात बाराशे (१२००) लेणी आहेत त्यापैकी सुमारे आठशे लेणी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील सर्व लेण्या व्यापारी मार्गावर आहेत. चांगला पोत असलेला कठीण आणि एकसंध असा पाषाण सह्याद्रीच्या अग्निजन्य खडकांच्या रूपात मिळाला.
आम्ही लेण्यांजवळ पोहोचताच सर्वप्रथम भव्य खांब दिसून आले. तिथे आमची वाट बघत A.S.I. (आर्कियॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया) चे संतोष दहिभाते आम्हाला माहिती देण्यासाठी थांबले होते.
ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात(इ.स.पूर्व पहिल्या शतकाचा उत्तरार्ध),एका एकसंध पाषाणात, जणू काही आधी कळस मग पाया असे वरून खाली फक्त छिन्नी हातोडीने इतके भव्य लेणे खोदण्यात आले. गुहेच्या बाहेर एक छोटा स्तूप होता त्याची माहिती देताना दहिभाते म्हणाले की पूर्वी आधी छोट्या प्रमाणावर शिल्पाची / छोट्या स्तूपाची निर्मिती करून ते काही वर्षांकरिता तसेच सोडण्यात यायचे. त्यावर ऊन,वारा,पाऊस याचा कसा परिणाम होतोय याचा अंदाज घेऊन पुढचे काम केले जायचे. भिक्षु एक दोन वर्षांनी परत त्याच स्थानी आले कि त्याचे निरीक्षण करून पुढचे काम करणे योग्य असेल का नाही ते ठरवत.
आमची आपापसात चर्चा चालू होती “अतिशय रेखीव मूर्ती त्याकाळी फक्त छिन्नी हातोड्याने कशा बनवल्या जात असतील? खरंच अद्भुत आहे”.“त्यातून हा बसाल्ट खडक (अग्निजन्य खडक) अतिशय टणक आणि कठीण”. A.S.I. चे दहिभाते आम्हाला माहिती देताना म्हणाले की त्याकाळात आधी छिन्नी आणि हातोड्याने एक मोठे भोक पाडून त्यात लाकूड ठेवले जायचे व सतत पाण्याचा मारा केला जायचा, त्यामुळे लाकूड फुगायचे व खडकाला तडा जायचा आणि तो खडक तोडणे सोपे व्हायचे.
घाटमाथ्यावर कोरलेली ही लेणी. त्यात भिक्षूंचे ध्यानमंदिर म्हणजे ‘चैत्यगृह’ आणि ‘वर्षा विहार’ म्हणजे राहण्याची सोय असे दोन विभाग पडतात. मोठा स्तूप, कलते खांब, चैत्याकार गवाक्षे तसेच वेदिका व लाकडी हर्मिका ही सर्व रचना इथे दिसून येते. आत शिरताच जे चार खांब दिसतात त्या पैकी दोन खांब पूर्ण स्वरूपाचे तर दोन अर्ध स्तंभ आहेत.एकेक खांबांच निरीक्षण केल की खाली चौथरा, त्यावर कलश, त्यावर अष्टकोनी खांब आणि त्यावर उमललेलं सुरेख कमळ, त्यावर अश्वारूढ, गजारूढ स्त्री आणि पुरुष दिसून येतात. नीलगाय आणि बैलावर आरूढ स्त्री-पुरुष असे शिल्पही दिसले. हे स्त्री-पुरुष हातातील कंकण, माळा, कर्णफुले, अशा विविध आभूषणांनी नटलेले आहेत.
मुख्य चैत्यगृहाच्या बाहेरील भिंतीवर पिंपळपान तसेच त्याखाली चैत्यकमानी कोरलेल्या दिसतात. मुख्य चैत्यगृह सव्वीस खांबांवर उभे केले आहे. आतमध्ये मोठा स्तूप आहे. चैत्यगृहाजवळील खोलीच्या द्वारपट्टीवर एक शिलालेख मिळतो. नाशिकच्या आनंद नावाच्या व्यापाऱ्याच्या मुलाने ही खोली बांधली असल्याचा उल्लेख त्यावर आहे. एका शिलालेखात या भागाचे नाव ‘मारकुड’ असल्याचा उल्लेख देखील सापडतो. ज्या धनिकांनी, व्यापाऱ्यांनी अथवा राजांनी ही लेणी खोदण्यासाठी अनुदान दिले त्यांची नावे इथे ब्राह्मी लिपीमधील शिलालेखात आढळून येतात. पण ज्यांनी इतकी अद्भुत शिल्प खोदली मग ती कार्ले भाजे लेणी असूदेत किंवा अगदी वेरूळची लेणी; या शिल्पकारांची नावे मात्र कुठेही दिसून येत नाही. इतक्या सुबक आणि रेखीव मुर्त्या, शिल्पकाम पाहून मनोमन खात्री पटते :हे अनाम शिल्पकार, वास्तुरचनाकार खरे प्रतिभावंत.
चैत्यगृहाच्या शेजारीच गजपृष्ठाकार एकसंध असे विहार आहेत. ते पण आवर्जून बघण्यासारखे.
या अतुलनीय शिल्पकृतींचे माहात्म्य गावे तितके थोडेच आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या लेण्यांचे सौंदर्य अजून खुलून दिसते ते सकाळच्या वेळी. सुवर्ण किरणांनी न्हाऊन निघालेले चैत्यगृह आणि खांब पाहणं म्हणजे अद्भुत अनुभव आहे. संतोष दहिभातेनी आम्हाला पहाटेच्या सुवर्ण झळाळीचे काही फोटो दाखवले आणि असा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आम्ही परत येऊ तेव्हा पहाटे लवकर येऊ असा निश्चय ग्रुप मधल्या अनेकांनी केला.
लेणी नीट बघताना त्यांच्या सौंदर्याबरोबर काही क्लेशकारक गोष्टी सुद्धा जाणवतात. मुख्य चैत्यगृहाची शोभा वाढवणाऱ्या लाकडी फासळ्या आता गायब आहेत. हत्तीचे सुबक शिल्प आहे पण त्याच्या सुळ्यांच्या जागी नुसत्याच खोबणी आहेत. पूर्वी तिथे हस्तिदंत किंवा लाकडी सुळे असावेत असा कयास आहे.
ही हीनयान पंथीयांची गुहा असून ते मूर्तिपूजक नाहीत त्यामुळे बुद्धाची मूर्ती आढळून येत नाही. पूर्वी इथे खांबांवर बुद्धाची आणि त्यांच्या शिष्यांची काही रंगीत चित्रे होती. हि चित्रे १८६१ (अठराशे एकसष्ट) पर्यंत अस्तित्वात असल्याची नोंद बॉम्बे गॅझेटियरमध्ये सापडते. त्यानंतर कोणी बडा इंग्रजी अधिकारी येणार म्हणून स्थानिक इंग्रज अधिकाऱ्याने ही सर्व चित्रे खरवडून काढली आणि त्यावर सफेदीचा हात दिला आणि अजून एका अनमोल ठेव्याला आपण मुकलो.
आम्ही लेण्यांवरून खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा बाहेर अंधार दाटला होता तर मनात असंख्य विचार. हे सर्व वैभव बघताना कुठेतरी वेदना सुद्धा होतात की खरोखरच अशा वैभवाला आपण पात्र आहोत का? आपण खरंच हा अलौकिक ठेवा जपण्याचे योग्य ते प्रयत्न करत आहोत का?
भारतीय संस्कृतीचं महत्व स्वदेशी तसेच परदेशी नागरिकांपर्यंत परिणामकारकरित्या पोचवण्यासाठी नुसतेच पुरातत्व खाते नाही तर सजग पर्यटक देखील गरजेचा आहे.
ता. क. हा लेख दिनांक 4 जानेवारी २०२० च्या प्रभात या दैनिकात वर्धापन दिन विशेष अंकात प्रसिद्ध झाला आहे.
Ref: Gazetteer of Bombay Presidency Volume XVIII Part III