मलिक अंबर महाल
पुण्याकडे परतताना भेट दिलेला मलिक अंबरचा महाल हा तर ‘चेरी ऑन द केक’ म्हणावा लागेल. सातवाहन काळापासून सुरु झालेली आमची सफर यादव काळातून प्रवास करत आता निजामशाही पर्यंत येऊन पोचली होती. मलिक अंबर हा निजामशाहचा वजीर. मूळ इथिओपियातून गुलाम म्हणून आलेल्या या मलिक अंबरला चंगेझ खानने विकत घेतले होते. काही वर्षांनी चंगेझ खानच्या बायकोने मलिक अंबरची सुटका केली व तो निजामशाहीमध्ये रुजू झाला. औरंगाबाद शहराच्या रचनेत मलिक अंबरचे महत्वपूर्ण योगदान मानले जाते.
या मलिक अंबर महालात औरंगजेबाने बालपणीची काही वर्षे व्यतीत केली होती. शिवनेरी जवळील हापूसबाग या गावात आजही हा महाल काहीशा दुरावस्थेत दिसून येतो. घराच्या रचनेवरून मलिक अंबरच्या सौंदर्यदृष्टीची आणि रसिकतेची कल्पना येते. गतकाळाच्या वैभवाची साक्ष तो महाल अजूनही देत आहे.
परतीच्या प्रवासात अनेक विचारांची मनात दाटी झाली होती. पगारातले ठराविक पैसे बाजूला टाकून आपण छान बचत करून परदेशी ट्रिप्स चे प्लॅन आखतो आणि ते यशस्वी सुद्धा करतो पण आपल्या आसपासचा परिसर आपल्याला किती ठाऊक असतो? तिथली वारसास्थळे, तिथल्या इतिहासाच्या खाणाखुणा, आपल्या शहराच्या विकासाचे टप्पे? आपल्या आजूबाजूची नैसर्गिक विविधता पाने, फुले, पक्षी, प्राणी ? याचे उत्तर बऱ्याच जणांच्या बाबतीत नकारात्मक असेल. आपल्या कळत नकळत या अमूल्य वारश्याकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होत असते.
नवीन वर्षाचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्व जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत आणि मनात नवंनवे संकल्पही आखत आहेत. चला तर मग, या नूतन वर्षी आपल्या आजूबाजूचा परिसर, तिथल्या गतकाळाच्या खाणाखुणा पाहूया, जाणून घेऊया, समजून घेऊया आणि ते जपण्याचा संकल्प करूया.